Revision 1003917 of "भागवत धर्म" on mrwiki

वारकरी संप्रदाय आणि वारकरी पंथ हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. वारकरी लोक ज्या आचरणप्रणालीचे पालन करतात, ज्यामध्ये श्रीविठ्ठलभक्ती प्रमुख आहे त्या धर्माला भागवत धर्म म्हणतात. या भागवत धर्माचा पाया श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी घातला आणि श्री संत तुकाराम महाराजांनी या धर्ममंदिरावर कळस चढवला म्हणूनच वारकरी पंथाचा नित्यस्मरणी महामंत्र आहे - 'ज्ञानोबा तुकाराम'. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद्भगवद्नीतेवर सर्वजनसुलभ असे प्राकृत भाषेत भाष्य लिहिले. ही ज्ञानेश्वरी हे मराठी वाड्मयातील अनुपम लेणे आहे. भागवतधर्माचा प्रमाणभूत ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. भारतातील भीष्मपर्वात असलेली गीता संस्कृतमध्ये आहे. कुरुक्षेत्रावर महाभारतीय युद्धाच्या प्रारंभी मोहग्रस्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोगाचा सदुपदेश केला. त्याच गीतेतील 18 अध्यायांवर ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीतून भाष्य लिहिले. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे अनन्यसाधारण असे स्थान आहे. ज्ञानेश्वरीनंतर भागवत धर्मांचे विवेचन करणारे अनेक ग्रंथ संतसत्पुरुषांनी रचले. त्यापैकी नाथ भागवत, रामायण, नामदेवगाथा, तुकाराम गाथा इ. प्रमुख आहेत.